गुरुवार, १९ मे, २०२२

वेदातील आनंद ब्रह्मलीन निगमानंद

           

                               ब्रह्मलीन निगमानंद महाराज यांची मूर्ती


        "दु:ख में सुमिरन सब करे सुख में करें न कोय |

             जो सुख में सुमिरन करे तो दुख काहे होए ||"

अध्यात्मातील ज्ञानाची गोडी निर्माण झाल्यानंतर भक्तीत तल्लीन होऊन नवीन  शोधाच्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना, तहानभूक हरवून दुःखाचे कारण शोधत आत्मशक्ती जागृत होते. तिलाच आपण दैवी शक्ती असे म्हणतो. या दैवी शक्तीला प्राप्त करून घेण्यासाठी योग साधना अत्यंत महत्वाची असते. चित्त शुद्ध,  एकाग्र झाले. अर्थातच सर्व विकारी गोष्टीवर नियंत्रण होते. या गोष्टीची परिपूर्ण जान ब्रह्मलीन स्वामी निगमानंद महाराजांना होती. सदैव त्यांनी प्रभू नामाच्या चिंतनाची आस सोडली नाही. संकटसमयी भगवंताचा धावा तर सगळेच करतात. परंतु , सुखांमध्ये हि प्रभू नामाची आवड आणि निवड करता आली म्हणजे, त्याला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. ही विशेष बाब भक्तजनांना बाबा सांगत असत. सर्व भक्तां प्रति बाबांची आशीर्वाद रुपी दया एक आगळेवेगळे विलक्षण देवत्व सिद्ध करते. प्रत्येकाची समस्या समजून  व त्यावर योग्य असा उपाय सुचवणे किंबहुना संकट मुक्ति चे मार्गदर्शन बाबा करत असायचे. जीवन प्रवास खूप खडतर होता. या संघर्षमय जीवनात आत्मशुद्धी साठी शिक्षणाची आस कधी सोडली नाही. शिक्षण हे शैक्षणिक अथवा अध्यात्मिक असो ते परिपूर्ण असले पाहिजे . त्याविषयी सखोल ज्ञान असणे ही त्या विद्यार्थ्याची तळमळ असली पाहिजे.


मायंबा च्या सेवेसाठी निघालेले सिताराम महाराज अर्थातच आजचे निगमानंद बाबा! ज्ञानासाठी प्रथमता आळंदी नंतर पंढरपूर.  आध्यात्मिक शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी - उच्चशिक्षणासाठी ऋषिकेश कडे बाबा वळू लागले. जिद्दीच्या जोरावर त्यांनी ऋषिकेश गाठले . बारा वर्षाच्या खडतर तपश्चर्येनंतर त्यांनी वेद, उपनिषदे यांचा सखोल अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांचे गुरू बाबां वरती एवढे खुश झाले की, त्यांनी बाबांना "निगमानंद" ही पदवी दिली. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास वेदातील आनंद असा त्यांचा अर्थ होतो. एवढंच नाहीतर भगवद्गीतेवरील त्यांचे प्रभुत्व एवढे होते की, एका पाश्चात्त्य व्यक्तीला भारतीय अध्यात्माने वेड लावावे. भगवद्गीता इंग्रजीतून शिकण्यासाठी बाबांच्या गुरुंकडे त्यांनी अट्टाहास धरला. बाबांच्या गुरूंनी मात्र निगमानंद इंग्रजीतून भगवद्गीता शिकवतील असा आदेश बाबांना दिला. इंग्रजीचे कसलेही ज्ञान नसताना त्या परकीय नागरिकाकडून इंग्रजी शिकून भगवद्गीतेचे भाषांतर इंग्रजीमध्ये सांगावे, ही एवढीच सरळ आणि साधी गोष्ट नव्हती. नंतर बाबांचे इंग्रजीवरील प्रभुत्व परिसरातील सर्व नागरिकांनी अनुभवले. एवढेच नाही तर बाबांनी या अंधकार मय परिसरामध्ये ज्ञानरूपी वटवृक्ष लावण्याचे कामही केले. श्री निगमानंद विद्यालय निमगाव येथे 1986 च्या नंतर विद्यार्थ्यांना इंग्रजी सुद्धा शिकवली ही वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. हे वास्तव चित्र तत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अनुभवणे, हे त्या विद्यार्थ्यांचे भाग्य!


हिमालयातील योग साधनेनंतर  शिक्षण पूर्ण करून बाबा आपल्या मायभूमीकडे परतले. प्रथम  त्यांचे आगमन सिंदफणा आणि किंवा नदीच्या संगमेश्वर मंदिरामध्ये झाले .  जटाधारी साधकाला भेटण्यासाठी सर्व परिसर उन्मळून पडला. गावातील प्रतिष्ठित आणि जुन्या लोकांनी बाबांची ओळख पटवली गेली." अरे हे तर आपले सिताराम बुवा!" बाबांचे आगमन हे त्या परिसरासाठी एक परिवर्तनशील स्थित्यंतर होते. एका भक्ताचे मायंबा वरती आगमन हे सर्वांसाठी आनंददायी आणि प्रेरणादायी होते.  बाबांच्या मनामध्ये चाललेली मनाची घुसमट मात्र थांबता थांबत नव्हती. मायंबा वरची पशुहत्या त्यांना सहन होत नव्हती. म्हणून त्यांनी या पशुहत्या वरती आपले अस्त्र उगारले. मायंबा वरची पशुहत्या ही सर्व परिसरातील लोकांना पचनी पडायला खूप वेळ लागला. परिसरातील बहुतांश विनाशकारी लोकांना पशुहत्या बंदी आवडली नाही .  बाबा मधील इच्छा शक्तीपुढे कोणतीही अघोरी शक्ती टिकू शकली नाही . शेवटी मात्र मायंबा वर पशुहत्या बंद केली आणि बाबांनी त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या निवासस्थान म्हणून भीमसिंह महाराजांच्या हस्ते दत्त आणि मच्छिंद्रनाथ मंदिराची उभारणी केली. अध्यात्मिक शक्ती द्वारे बाबांनी कबीर पंथी एकतारी भजन याद्वारे निर्व्यसनी आणि माळकरी भक्तगण निर्माण केला. त्याकाळी ,"वाजेल टाळ तर पडेल काळ."  अशा अंधश्रद्धा विरोधी मोहिमा त्यांनी खंडित केल्या. बाबा प्रत्येक वाईट गोष्टींना विरोध करून चांगल्या सवयी समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न करत होते. परंतु काही चांडाळ चौकटी करणारे लोक बाबांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करत होते. कधी कधी बाबा एवढे हतबल होत असत की, त्यांना असे वाटे," परत आपण हिमालया मध्ये जावे. " गुरु असणारे वामनभाऊ महाराज त्यांना आठवत वामन भाऊ महाराज म्हणत ,"आपणास असे करून कसे चालेल, आपले आगमन या परिसर उद्धारासाठी झालेले आहे . त्यामुळे आपण परत जाऊ शकत नाही." तेव्हा मात्र बाबांमध्ये एक वेगळीच स्फूर्ती निर्माण व्हायची आणि बाबा पुन्हा नेटाने धार्मिक कार्याच्या कामाला लागत. शेवटी देवाचा अंश ना ते !कधीही थकले नाहीत. अविरतपणे भजनाच्या माध्यमातून एक- एक भक्त जोडत गेले. पुढे चालून  वारकरी संप्रदायाची पताका त्यांनी हाती घेतली पंढरपूर ,आळंदी आणि पैठण अशा दिंड्या सुद्धा जाऊ लागल्या. हजारो लाखो, वारकरी, वारकरी संप्रदायामध्ये जोडला गेला. पंढरपूर आळंदी आणि पैठण या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून , त्याठिकाणी मोठमोठे भक्तनिवास उभारले. या फक्त निवासामधून सर्व वारकरी संप्रदायाला धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर आश्रय मिळाला ही बाबांची पुण्याई.


संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्यांसाठी अर्थात बहुजनांसाठी ज्ञानाची द्वारे ज्ञानेश्वरी द्वारे खुली  केली.  तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली . संत तुकाराम महाराजांनी तर त्यामध्ये एक नावीन्य आणि नवचैतन्य निर्माण केले. जवळपास आपल्या 5000 अभंगांमध्ये सर्व जनतेला ज्ञानदान केले आणि तोच ज्ञानदानाचा मार्ग बाबांनी  आपल्या कार्यातून समर्थपणे पेलला. सर्व परिसरातील लोकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. आज मच्छिंद्रनाथ गड येथे बाबांच्या हातून निर्माण झालेले स्वर्ग रुपी स्थान या ठिकाणी उभारले गेले आहे. बाबांच्या वैकुंठ गमनानंतर गडाची यशस्वी परंपरा स्वामी जनार्दन महाराज पार पाडत आहेत.  ब्रह्मलीन निगमानंद महाराजांनी गडावर आलेल्या प्रत्येक भक्ताची विचारपूस करावी त्याची अडचण समजून घ्यावी आणि त्या समस्येची निरूपण करावे ही भक्त गणांसाठी एक आगळीवेगळी नांदी ठरत होती. बाबांनी या गडाच्या माध्यमातून लाखो वारकरी निर्माण तर केलेच परंतु , महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजलेले  ख्यातनाम गायक व कीर्तनकार सुद्धा निर्माण केले. 


आज बाबा आपल्यात नाहीत. पण त्यांनी निर्माण केलेल्या धार्मिक वारकरी गड व शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ते आपल्यात सदैव विचाराने आणि आशीर्वादाने सोबतच आहेत . याची जाणीव प्रत्येक क्षणी होते .त्यांनी निर्माण केलेल्या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत .मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. मुलींचे शिक्षण हे बारावीपर्यंत होत आहे. काही मुली सुद्धा नोकरी करताना दिसत आहेत. हे फक्त बाबांच्या दूर दृष्टिकोनातून सिद्ध होत आहे . समाजाला विकसित करण्यासाठी, शिक्षण किती महत्त्वाचे आहे?  हे बाबांना माहित होते. म्हणून, त्यांनी शिक्षण गंगा दारोदारी पोहोचवली. ती शिक्षण संस्थेच्या माध्यमातून. शैक्षणिक क्षेत्राबरोबर आध्यात्मिक क्षेत्राकडे ही त्यांनी आपला भर दिला. आळंदी सारख्या पवित्र ठिकाणाहून संस्कृत शिक्षण दिले जात आहे. भरकटलेल्या मनाला एकाग्र करण्यासाठी अध्यात्माची आवश्यकता आहे. हे बाबांनी ओळखले होते. म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच आध्यात्मिक क्षेत्राकडे सुद्धा खूप लक्ष दिले.

देव म्हणजे आहे तरी काय ? एखाद्याचा पाठीवरती हात असणे, आणि एखाद्या संकटावर मात करणे. तोही देवच ! एखाद्याचा पाठीवरती हात नसणे आणि बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करणे. अर्थात स्वयंस्फूर्तीने स्वतःतील चेतना जागृत करणे, तोही देवच ! एखाद्याच्या शाब्दिक आधाराने अस्थिर मनाला स्थिर करणे, तोही देवाच ! या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी मिळणे त्यालाच संत म्हणतात. या संतांचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे, तोही देवाच!  देवाचा अनुभव आणि अनुभूती ही वेगवेगळी असू शकते .सार मात्र' यश' हाच आहे.  हाच अनुभव बाबांच्या सानिध्यातील भक्तगण घेत असावेत. म्हणूनच नांदेवाली याठिकाणी ब्रह्मलीन निगमानंद महाराजांचे भव्य मंदिर उभारले गेले आहे. त्यामध्ये मनाला मोहीत करणारी मूर्ती एक आगळेवेगळे आश्चर्य. गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथे सुद्धा मोठ्या आनंदी उत्साहाने तळणेवाडीकर बाबांची मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उभारणी करत आहेत. ही बाबांवर असणारी त्यांची श्रद्धा आणि भक्ती होय . मंदिरातील मुर्त्या पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येतं, त्या मूर्तींची कीर्ती खूप असते . समाज विकासित व्हावा, त्याचे भले व्हावे ही प्रांजळ भावना त्या संतांच्या ठायी असते.  त्यासाठी त्यांना अनेक समाज कंटक यांच्याशी लढा उभा करावा लागतो. तोही अहिंसा ,अध्यात्मिक शक्ती द्वारे .परंतु, हे परिवर्तन इथे सहज आणि सरळ सोपे नसते. त्यासाठी त्यांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. समाजाकडून होणारा त्रास सहन करावा लागतो. तोही समाजाच्या भल्यासाठी! हे विशेष . तेव्हा कुठे त्यांना देवत्व प्राप्त होते. अशा या महान संतांच्या चरणी नतमस्तक होतो .जय निगमानंद!

लेखक :: डोंगरदिवे राहुल रामकिसन


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा