बुधवार, १० मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग-5)

भाग: ५

वाजेल 'टाळ'तर..पडेल काळ!



स्वामी निगमानंद महाराज

निगमानंद माऊली येथे आले, आणि सर्व  परिसरामध्ये आनंद, नवचैतन्य प्रवाहित होऊ लागले .  जो तो येणाऱ्या  अपेक्षित असणाऱ्या , सत्याचा  शोध घेण्याचा प्रयत्न करु लागला.समाजामध्ये अनेक प्रकारची लोक होती. कोणी सकारात्मक तर , कोणी नकारात्मक होती. परंतु, असाही एक वर्ग होता की, तो फक्त या बदलाचे साक्षीदार होऊ पाहत होता. ग्रामीण भागात  'डोळ्यावर नको',  या मताचा प्रवाह व प्रभाव आहे . 

महंत भीमसिंह महाराज यांच्या नेतृत्वाने मच्छिंद्रनाथ गडाची उभारणी झाली.  निगमानंद माऊली हे निश्चित या अघोरी प्रथांना बंद करणार, हा त्यांचा  अटळ विश्वास . मायंबा वर चालत आलेली अशीच एक प्रथा, मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी व ती पूर्ण झाल्यास अथवा होण्यासाठी 'पशूबळी' दिला जायचा. वर्षानुवर्षे चालत आलेली ही प्रथा, बंद करणे आव्हानच होते. बंद नाही केले तर, त्यात दिला जाणारा पशुबळी, त्यांच्या किंचाळ्या, ती दाहकता, बाबांच्या हृदयाला घायाळ करत असे, बाबा  विवष होत असत. असेही काही धर्ममार्तंड होते की, ज्यांना हा चालत असणारा क्रुर डाव आवडत असे.  कारण, त्या नावाखाली त्यांच्या वाईट चालीरीतींना पाठबळ मिळत असे. यामुळे लोक व्यसनाधीन बनले होते, वाममार्गाला लागले होते. सदगृहस्थ शोधणे तर सहज शक्य नव्हते . प्रत्येक जण आपल्या स्वच्छंदी लहरीप्रमाणे, कोणाच्याही भाव भावनांची कदर न करता वागत होता. अज्ञानी अंधकारी,  रुढी-परंपरांचा गैरवापर करणारे, व स्वतःच  एक भय प्रस्थापित करून, समाजावर निर्बंध लादनारांना, हे माहीत नव्हतं की, ही अंदाधुंद बंद होणार आहे. या वाईट व क्रूर प्रथा क्रुर प्रथा बंद होणार आहेत. कारण, परिसरात बाबांच्या रूपात एक अलौकिक शक्ती , संचार करते आहे. हे अज्ञानी लोकांना काय कळणार? 

       "धरूनी केशवा भावबळे |
                   पापिया न कळे काही केल्या || "

मायंबावर मच्छिंद्रगड निर्माण झाला इथून पुढे इथे आता पशुहत्या होणार नाही हा संदेश सर्व परिसरामध्ये व दुर्जनांमध्ये पोहोचला त्यांच्या पोटात पोटशूळ उठले त्यांना ही बाब नवखी होती बाबांविषयी त्यांच्या मनात चीड होती पण ती अंतर्मनात होती प्रत्यक्ष सामना करण्याचे धाडस कोणामध्येही नव्हते बाबांचा सडपातळ उंच पुरा देह व सूर्यालाही लाजवेल असे अलौकीक तेज सर्वांना दिपून टाकत होते प्रत्येक दुर्जनांना या अनुभवाची अनुभूती येत होती टीकाटिप्पणी करायची पण ती त्यांच्या पाठोपाठ समोर नाही अपप्रचार व शंकांचे काहूर माजून ठेवले याशिवाय दुर्जनाकडे होतेच काय? निंदकाचे घर असावे शेजारी यानुसार या अज्ञानी लोकांकडे बाबा दुर्लक्ष करत पशुहत्या बंद झालीच पाहिजे या निर्णयाने बाबा कठोर झाले त्यांनी सर्व या समाजातील आंधळ्या (अज्ञानाने ) लोकांना, भीक घातली नाही पशुहत्या बंद झाली सर्वांना बरे वाटले म्हणतात ना देव चांगल्या माणसाची परीक्षा घेतो त्यामध्ये संत सुद्धा आले देवाच्या प्रत्येक आव्हानाला जाहीरपणे स्वीकारणे आणि ते विजय रूपाने सिद्ध करणे हे सामर्थ्य फक्त संतांमध्ये आहे ते संत म्हणजे निगमानंद माऊली होत. 

मच्छिंद्रनाथ गडावर आता भजनाला सुरुवात झाली. भजनाचा अविभाज्य घटक म्हणजे 'टाळ' हा  टाळ वाजल्याशिवाय   भजन ते काय ? कसे कळणार? नेमका या दुष्टप्रवृत्तीच्या लोकांनी, 'टाळा' वर आघात केला. नको त्या वावड्या व संभ्रम समाजात पेरण्यास सुरुवात केली. टाळ् वाद्य समोर ठेवून, एका अमंगळ वाक्याला सुरुवात केली, ' टाळ वाजल्याने काळ पडेल '. हा गैरसमज येवढा पसरला कि, गडावर टाळ न वाजण्याचा, प्रत्यक्ष प्रत्यय सर्वांना येऊ लागला. अशा गैरसमजांना सद्गुणी लोकांना बळी जाऊ देतील, बाबा. नाही. यावर त्यांनी समय सूचकते नुसार ,भजनाचा आयाम बदलला. दुष्ट लोकांच्या माथी हीच लाठी होती. परंतु , अज्ञानी लोकांच्या लक्षात आले नाही . देवाचे नामस्मरण ही बाब त्या मुढांना कळणार नाही. 

 बाबांना या दुष्टांच्या अपप्रचाराबद्दल जाणीव होती. त्यांनी त्यांच्या विरोधात अध्यात्मिक बदल करण्याचा स्वयम् निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्याशी वाद घालण्याचा मानस न ठेवता,संवाद साधत, ज्ञानामृत देत, त्यांच्याबद्दल घडवण्याचा प्रयत्न केला.'मुढाशी काय समजावणे ', यानुसार, बदल जरा समोर होत असे. " कुत्र्याचे शेपूट. ..", असा त्या दुराचारी दुर्जनांचा स्वभाव होता. बाबांच्या अमृतवाणीने सद्गुणी लोक जवळ येऊ लागले,त्या लोकांना नामस्मरण व भक्तीचा मार्ग आवडू लागला. परंतु ,धर्ममार्तंडाच्या,'टाळ वाजल्याने काळ पडेल', या दुष्टप्रवृत्तीचा प्रभाव त्यांना रोखत होता. ही गोष्ट बाबांना कळल्यावर, त्यांनी भजनही टाळावीना होऊ शकते, हा आत्मविश्वास दिला. सुरुवातीला याचा आरंभ करूयात असे ठरवले. 

टाळावीना भजन कसे? हा या सद्गुणी ग्रहस्ताना पडलेला प्रश्न. बाबांनी भजनाला सुरुवात केली भजन होते,कबीरपंथी! एक तारी भजनाला सुरुवात झाली. भजनामध्ये बाबा तल्लीन होत असत. भक्त जनाला हे प्रथम नवखे होते. कबीर पंथी  भजना मधून सुरुवात झाली. टाळाच्या काळावर हा उपाय होता. कारण यामुळेच टाळांचा काळ येणार होता. या निर्वीवाद सत्याची जाणीव बाबांना होती. एक तारी, कबीर पंथी भजनाने चांगलाच सूर आवळला होता. आगळ्यावेगळ्या भजनाने लोक मोहित झाले होते. भगवंत नामस्मरणाची अवीट गोडी प्रत्येकाच्या नसानसामध्ये सळसळायला लागली. कधी सायंकाळ होते? प्रभू नामस्मरणाला केव्हा सुरुवात होते? असे नव भजनी मंडळीला झाले होते.  भजनाचा नित्यक्रम सुरू झाला. 

एकतारी भजनाची सर्वांना गोडी लागली. टाळ नसल्याने सर्व भजनीजनात आनंद संचारला. वरचेवर भजनी मंडळ वाढत होते. कबीर पंथी भजनातून,"हरी मुखे म्हणा"..तुकारामाचे अभंग, लोकांच्या मुखातून, एकतारी मधून ,गाऊ लागले वाजू लागले. कबीर पंथातून कधी महाराष्ट्राच्या भजनाची सुरुवात झाली, हे त्या भजन कर्त्या मंडळींना  कळले सुद्धा नाही. गडावर गावामध्ये नामस्मरण व हरिनामाचा जप सुरु झाला. प्रत्येकाची भजनाची आवड एवढी वाढली की,भजनामुळे त्यांना मानाचे स्थान मिळू लागले.भजनीमंडळ - बाबांच्या मुळे, हे शक्य झाले. स्वतः  मनन चिंतन करत असत, बाबांचा शब्द त्यांना मोलाचा वाटू लागला. 

      "भक्ती ज्ञानाची माऊली , करी कृपेची सावली"

भजनात टाळ वाजला तर बघुयात काय होते अन प्रत्यक्ष भजनात टाळ वाजण्यास सुरुवात झाली-

 "देव पहाया सी गेलो, देव होऊनी ठेलो"

असा नवीन अभ्यास रुपी अनुभव त्या वारकरी भजनी मंडळाने अनुभवला. भजनाचा आत्मा टाळ भजनामध्ये वाजू लागला. साक्षात भगवंत आपल्यासोबत भजन करतो आहे.  याचे गोड कौतुक होऊ लागले. टाळा शिवाय भजनाला पर्याय नाही. पशुहत्या बंदी नंतर पेरले गेलेले विष , ज्ञानरूपी अमृताने नष्ट झाले. बाबा मधुर  वाणीतून-

" मुंगी आणि राव | आम्हा सारखाची जीव|"

ही संत तुकारामांची भावना पदोपदी सत्य कशी आहे हे सांगू लागले जीव मग तो मुंगी चा असो अथवा कोणा  एका मोठ्या व्यक्तीचा तो आमच्यासाठी सारखाच आहे म्हणून पशुहत्या नको हा शुभ संदेश जनतेने स्वीकारला

आज या छोट्याशा रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. भजन, नामसंकीर्तन, प्रवचने यांनी सर्व परिसर, जिल्हा भक्तिमार्गाने न्हाऊन निघाला आहे.  याच ठिकाणी 41 व्या सप्ताहाची परंपरा  पार पडत आहे. याच भूमीत टाळांचा निनाद अखंडपणे सुरू आहे. सर्व परिसर प्रफुल्लित झाला आहे. ज्ञानाचे अमृत सुरू आहे. प्रत्येक ज्ञानाच्या भुकेने अतृप्‍त भक्त, ज्ञानामृताने तृप्त होत आहे. असा निगमानंद माऊलींचा सोहळा सुरू आहे. बाबा वार्षिक अखंड हरिनाम सप्ताहाचे संयोजन व  देखरेखीच्या  कारभारामध्ये प्रत्यक्ष लक्ष ठेवतात.   वंदनीय हरिभक्त परायण जनार्दन महाराज बाबांच्या छत्रछायेखाली, एक अकल्पनीय व्यक्तिमत्व साकारत आहे. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांनी चालवलेल्या सत कार्यास, सहकार्य व मनोभावे भक्ती करतात,जनार्दन महाराज. 

"एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ"

असा वारकरी व भजनी बाबांनी तयार केला. धर्ममार्तंडांनी पेरलेली अंधश्रद्धा बाबांनी पूर्ण झुगारून, वास्तव सत्य मांडले.

सर्व जणास-

"तमसो मा ज्योतिर्गमय "हा मार्ग दाखवला! 



Writer : RAHUL DONGARDIVE

रविवार, ७ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी ( भाग-4)

  भाग : 04

       मातृभूमीची आस... 

स्वामी निगमानंद महाराज

अखंडपणे सलग 14 वर्षाच्या काळात योग साधना, सर्व शास्त्रांचा अभ्यास, आणि चिंतन-मनन केलेल्या ज्ञानार्जनाचा उपयोग, हा मानवी कल्याणासाठी व्हावा. हा त्यांचा मानस, त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. पुढील आचार्य पदाचे शिक्षण घेऊन आश्रमात ज्ञानदानाचे कार्य करावे. असा विचार मनात येत होता. पण ..त्यात त्यांना स्वारस्य वाटले नाही. भारत भ्रमनामध्ये त्यांना आलेले अनुभव, हे सतावत होते. परंतु ,  त्यावर ज्ञानाच्या अनुभूतीने उपाय काढता येतो. ही त्यांची स्वयम् इच्छाशक्ती, मात्र त्यांना त्या दुःखितांचे आधार बनू पाहत होती. भ्रमंती करत असताना त्यांनी समाजातील अंदाधुंद अअत्याचार, फसवणूक ,  एखाद्याच्या दुःखाचा गैरफायदा, लोक कसे घेतात? हे ही पाहिले होते. शेवटी त्यांनी या समाजाला भौतिक सुखापेक्षा, भगवंताच्या सेवेमध्ये आगळेवेगळे सुख आहे . हा त्यांचा महत्प्रयास त्यांना मायंबा कडे आकर्षित करत होता. 

ज्ञान प्राप्ती नंतर सिताराम बाबा आता श्रीगुरूंच्या आशीर्वादाने "निगमानंद" झाले होते. निगमानंद बाबा आता आपल्या मात्रुभूमिकडे मार्गस्थ झाले. आपला पूर्व भूतकाळ डोळ्यासमोर तरळत होता.  माऊलींच्या त्या मागणीचा त्यांना विसर पडत नाही.  माझा जन्म हा फक्त आणि फक्त 'मायंबा' च्या सेवेसाठी आहे. वास्तविक पाहता वडील बंधू नरहरी बुवा स्वतः या कामासाठी तयार होते. नव्हे, त्यांना त्यांची खूप आवड होती. बाल सीतारामाना त्यांनी सदैव सांगण्याचा प्रयत्न करत होते - "मी मायबाची सेवा करतो,  तू संसार सांभाळा. "  निगमानंद बाबा मात्र त्यांना आपल्या आईच्या मायंबा ला केलेल्या मागणीचा पुनरुच्चार करत  असत. तेव्हा मात्र नरहरी बुवांना माघार घ्यावी लागत असे. 

नांदेवाली- निमगाव -राळेसांगवी या तिन्ही गावच्या मध्यभागी, ओसाड माळरानावर ती मायंबा ची दोन मंदिरे. मधेच झुळझुळ वाहणारी सिंसिंदफणा, साथ देण्यासाठी किना नदी. सिंदफणा व किना नदीवरच्या संगमावर संगमेश्वराचे मंदिर.  मधेच घंटेचा निनाद, कानाला अल्हाददाय व मंत्रमुग्ध करत असायचा. बालपणी शिक्षकांना झालेला पश्चाताप. पोहायला गेल्यावर मुले,  मासा, त्यांच्या अंगावर फेकून देत असत. माळ आडकवण्याचा प्रयत्न करत असत..  हे स्मरण होत होते . बाबांना,  आता हा फक्त पूर्व भूतकाळ स्वप्नाळू वाटत होता. आता त्यांच्याकडे ज्ञान आणि या ज्ञानाचा वापर समाज सुधारण्यासाठी करायचा होता. 

सन 1967 ला बाबा मायंबा वर वर पोहोचले.  चेहऱ्यावर सूर्य प्रकाशा एवढे तेज,  रोम रोम  प्रसन्नता, भगवे कपडे धारण केलेले, डोक्यावर जटा, दाढी वाढलेली, उंच सडपातळ शरीरयष्टी, असंन अवस्थेत  बाबा  मायंबा वर येऊन स्थिर झाले होते. सकाळच्या प्रहरी परिसरातील माणसे,  आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी ये जा करू लागली. मायंबा पासून जात असणाऱ्या वाटेवरून एका वाटसरू ने पाहिले, कोणीतरी एक जटाधारी साधूमहाराज, मायंबा वर आसनस्थ आहे. त्याने ओळखण्याचा प्रयत्न केला, पण....तेजाने भरलेल्या, त्या  मूर्तीची त्याला ओळख पटेना, बोलण्याची हिम्मत होत नव्हती. गावात येऊन ही वार्ता कळत, ना कळते.  तोच ही वार्ता, मायंबा परिसरात वार्‍यासारखी पसरली. निमगाव, नांदिवली,  राळेसांगवी गावचे लहान-थोर मंडळींनी मायंबा वर धाव घेतली. आजूबाजूच्या गावातील माणसांच्या रांगाच्या रांगा लागल्या. प्रत्येकाला कुतूहल वाटत होतं.  साधू आणि तोही जटाधारी, अगंणया कपड्यात, मराठी बोलता येत नाही. नक्कीच कोणीतरी महान व्यक्ती असणार, पण..कोण ? हा यक्षप्रश्न त्यांना अनपेक्षित असाच होता. 

खूप मोठ्या प्रमाणात मायंबा वर लहानांपासून थोरांपर्यंत गर्दी झाली. बाबांचे ते तेज पाहून प्रत्येक जण आश्चर्यचकित होत होता, ओळख मात्र पटत नव्हती. काही ज्येष्ठ मंडळींनी मात्र या अनोळखीचे,  ओळखीत रूपांतर केले. कोणीतरी म्हटले, " अरे, हे तर, सिताराम बाबा! " प्रत्येक जण एकमेकाकडे आश्चर्याने पाहू लागले. सर्व ज्येष्ठांना सिताराम बाबांची ओळख पटली. सिताराम बाबा मायंबा वर आले, ही बातमी बाबांच्या आईच्या कानावर  धडकली. आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंद गगनात मावेनासा झाला. त्याचक्षणी सर्व कुटुंबाने मायंबा वरती धाव घेतली. आईने सिताराम बाबांना ओळखले. आईला, भावाला काय करावे ? ते सुचत नव्हते. आनंदाने गहिवरून आले,तेजाने ओथंबून भरलेली साधूची मूर्ती मनाला गहिवरून टाकत होती. सर्वजण दर्शन घेऊन तृप्त झाले होते. आईच्या ममत्वाने मर्यादा पार केल्या, " माझा सिताराम!!!!  " ही हाक सारखी टाहो फोडत होती. ती हाक, बाबांनी ऐकले असावी, आणि बाबा उद्गारले.. 
     "हम किसी के कोई नही लगते, हम निगमानंद है |
       अलख निरंजन|"
बाबा  ज्या सहवासात 14 वर्षे राहिले, तेथे 'हिंदी बोलीभाषेचा वापर  होता. त्यामुळे, त्यांना मराठीचा अडसर येत होताा. आईच्या हाकेला दिलेलं बाबांचं,  हिंदीतील उत्तर मात्र सर्वांनाच आश्चर्यचकित करून गेलं. संन्याशाला ना जात,  ना पंथ,   ना नात, ते फक्त निगमानंद होते. 


बाबांचा सहवास हा त्या परिसरासाठी एक विलक्षण होता. बाबांना ते एक वेगळेच होते. ज्ञान आणि वास्तव परिभाषा, ही  निराळीच होती.  बाबांची परिसर भेट,  ही त्या परिसरातील , एका- एका पैलूंचा उलगडा करत होती. प्रत्येक गावात अन्याय - अत्याचार, या राक्षसी प्रवृत्तीचा संचार होता. सद्विचारी माणसांची भेट तर मुश्कील होती. सर्व परिसरात असूरी प्रवृत्ती बोकाळली होती.   कोणी कोणाचे ऐकायला व सांगायला तयार नव्हते. प्रत्येक जण आपल्या वाईट व्यसनांमध्ये मशगुल होता. 

अनेक संसार मोडकळीस आले होते. अनेकांची वाताहात होत होती. अनेक जण फक्त चैन विलास व मद्यधुंद अवस्थेत जीवन जगत होते.   गोरगरिबांचे जीवन तर जगणे तर खूप कठीण होते.  गावात जलसे, तमाशे,  गावचा अंदाधुंद, अनैतिक व्यवहार आणि पशुहत्या या गोष्टीने बाबांना घायाळ करून टाकले. समजावण्याचा प्रयत्न केला, तर लोक ऐकायला तयार  नाहीत. ही समाजाची विघातक अवस्था बाबांना अस्वस्थ व घायाळ करत होती.  बाबांना, काय करावे? असा प्रश्न पडला. 

बाबांना एवढे दुःख झाले की, या लोकांना सुधारणे पाहिजे तेवढे सोपे नाही. समजून सांगूनही उपयोग होत नाही. बाबा चिंतन करत असायचे.  शेवटी आपण परत हिमालयात निघून जावे, असा त्यांचा निश्चय झाला. तो निश्चय त्यांनी, सद्गुणी लोकांना बोलून दाखवला. तो निर्णय निगमानंद बाबांचा आहे बाबा आता परत हिमालयात जाणार अशी वार्ता परिसरात पसरली आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना याचा आनंद झाला.  परंतु, नियतीला हे मान्य नव्हते. कारण, मायंबा परिसराचा उद्धारकर्ता, या भूमितून परत जाऊ देईल कशी ? ही जन्मभूमी! 
निगमानंद बाबा पुन्हा परत हिमालयात निघून जाणार, ही वार्ता  गहिनीनाथ गडावर वामन भाऊंच्या कानावर पडली. त्याचबरोबर भगवानगडावर सुद्धा पोहचली. संत वामनभाऊंना आणि भीमसिंह महाराजांना माहीत होते. निगमानंद महाराज ही साधी हस्ती नाहीयेत.  तेव्हा, या संत महात्म्यांनी मायंबा कडे धाव घेतली.  नांदेवाली येथे आल्यावर, संत वामनभाऊ नि त्यांना निरोप दिला. संत वामन भाऊंना बाबा खूप मानत असत.  संत भाऊंचा निरोप मिळाल्यावर बाबा मायंबा वरून नांदेवाली ला गेले. 

भाऊ विषयी असणारा आदर आणि अपार श्रद्धा, बाबांना पाहताच दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी  मारली. भाऊंनी बाबांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला.  भाऊंनी त्यांच्या ज्ञानाची सत्वपरीक्षा पाहिली. बाबांना उद्देशून म्हणाले, "सीतारामा, हे निगमनंदा. तू स्वहित करून आत्मकल्याण करून घेतलेस. आता या बुडत असलेल्या, दिशाहीन झालेल्या जनतेचा सांभाळ कर, त्यांचा उद्धार कर, हिमालयात परत जाऊ नकोस, जनकल्याण हे तुझ्या हातून होणार आहे. "  संत भिमसिंह महाराजांनी  मायंबा वर राहण्यास सांगितले . पुढे मायंबा चे मच्छिंद्रगडाच्या  स्थापनेत , भिमसिंह महाराजांचे खूप मोठे योगदान होते. भाऊंच्या सल्ल्यानंतर , निगमानंद महाराजांनी आपले मौन वृत्त सोडून दिले. 'रामकृष्णहरी' म्हणून  मौन वृत्त सोडून,  अंदाधुंद समाजाला कल्याणकारी मार्गावर आणण्यासाठी आज पर्यंत कार्य सुरू आहे .  मायंबा चे आज विशाल आशा मच्छिंद्रगडामध्ये रूपांतर  झाले आहे. 
             
                                                             क्रमशः...                                    

  Writer : 

- डोंगरदिवे राहुल रामकिसन


गुरुवार, ४ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोर ( भाग 3)

 भाग : 3 

     आत्मशुद्धीसाठी शिक्षण


 
स्वामी निगमानंद महाराज

देवाचा आशीर्वाद आणि त्यावरची अपार श्रद्धा , यामुळे सिताराम बुवांना, मायंबा च्या सेवेला अर्पण केले . सिताराम बुवांना लोक अदरांनी बाबा , बुवा किंवा मायंबा म्हणत असत. सिताराम बुवा मात्र आपल्या वैयक्तिक ज्ञानग्रहणच्या छंदात रममाण झाले .तसं , प्राथमिक शिक्षण  हे  त्यांन खालापूरीच्या खाजगी शिक्षकाकडून मिळालं . त्यांच्या असणाऱ्या  विलक्षण क्षमतेने ते शिक्षकही अचंबित होत . परंतु, एकदा त्यांनी केलेल्या शिक्षेमुळे त्या शिक्षकांना अपचनाचा त्रास सुरू झाला . मायंबा चा प्रसाद आहे 'सिताराम!' मायंबा ला शरण जा ,असे सांगितले गेले. तेव्हा कुठे शिक्षक बरे झाले. पुढे सीताराम बुवा त्या शिक्षकाचे आवडते झाले. 

सिताराम बुवा श्रद्धावान होतेच, परंतु  ते वास्तवाचे भान राखत . त्यांना कळून चुकले होते की , ज्ञानाशिवाय पर्याय नाही . ज्ञान मिळवायचे झाल्यास आपणाला आळंदी शिवाय पर्याय नाही . प्राथमिक असणाऱ्या भजन, गाथा यावर सिताराम बुवा समाधानी झाले नाहीत. ज्ञान हे शिक्षणाशिवाय मिळत नाही . त्यांनी आळंदी ला जाण्याचा निर्णय घेतला . 1951साली त्यांनी आध्यात्मिक शिक्षणासाठी अत्यंत बिकट परिस्थितीतून आळंदी ला प्रयाण केले. 

आळंदीला बुवा पोहोचले . तेथे त्यांनी ज्ञानार्जनासाठी श्री सद्गुरू ब्रह्मभूत तात्या महाराज साखरे, यांच्याकडून गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे शिक्षण घेतले . शिक्षण घेत असताना आपली उपजीविका भागविण्यासाठी चे नियम आश्रमामध्ये अत्यंत कठोर व कडक होते. दैनंदिन दिनचर्या चालवण्यासाठी आश्रमामध्ये प्रत्येक साधकाला स्वतः प्रयत्न करावे लागत असंत . त्याचाच एक भाग म्हणजे पूर्ण आश्रम हा मधुकरी वर चालत असे. मधुकरी साठी आळंदी परिसरामध्ये चार पाच किलोमीटर पर्यंत जावे लागत असे. मधुकरी मधून मिळालेल्या भाकरीवर ती आश्रम व्यवस्था चालायची. त्याकाळी परिसरातील लोकही एवढे सदन नसल्याने मधुकरी समाधानकारक नव्हती. मिळेल ती भाकरी सर्व साधकांमध्ये वाटून खायची ,असा आश्रमाचा नित्यक्रम असे . कधी कधी तर मधुकरी व्यवस्थित समाधानकारक न मिळाल्यास आश्रमातील शिळे तुकडे भुगा करून साधकांना दिला जाई . या प्रसंगांना तोंड देऊन ज्ञानार्जन करणे ही मोठी तारेवरची कसरत किंबहुना एक खडतर प्रवास होता. 

आश्रमातील नियम व ज्ञानार्जन यात खूप सायास होते. या परिस्थितीचा बाबांवर गंभीर परिणाम झाला. त्यांना अपचनाचा त्रास होऊ लागला . त्यातून त्यांना अतिसार सारखा गंभीर आजार जडला. तब्येतीत सुधारणा मात्र होत नव्हती . नाईलाजास्तव त्यांना आळंदी सोडावी लागली. शरीर अतीक्षीण झाले होते  रेल्वेने पुण्याहून ते अहमदनगर ला आले . एकेक पाऊल टाकने बाबांना शक्य होत नव्हते . कसेबसे ते एका झाडाखाली आश्रयासाठी पहुडले. प्रत्येक रेल्वे स्टेशनला येजा करणारा , त्यांची विचारपूस करत होता. पोटात अन्नाचा कण नाही .खिशात पैसा सुद्धा नाही. नगरहून नांदेवालीला -निमगाव मायंबाला येणे तर शक्यच नव्हत . काय करावे ? सुचत नाही .शेवटी कोणीतरी तेथील एका व्यक्तीचे नाव सुचवले की ,जो तुम्हाला मदत करेल . बाबा मोठ्या प्रयत्नानेे त्या व्यक्तीकडे पोहोचले सायंकाळ झाली होती . सुचवलेल्या  व्यक्तीने बाबांना मयांबा वर पोहोचता येईल अशी तजवीज केली. मुक्काम करून बाबा अत्यंत दयनीय अवस्थेत दुसऱ्या दिवशी मायंबावर पोहोचले. 

बाबांची ही अवस्था पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. बाबा मायंबावर राहू लागले. आळंदीची मधुकरी प्रथा येथेही सुरू केली. दिवसेंदिवस बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. बाबांची प्रकृती सुधारली . पुन्हा बाबांच्या ज्ञानाच्या भुकेने आळंदी खुणावत होती .बाबा आळंदी ला रवाना झाले. आश्रमातील वातावरण आता बाबांना साथ देत होते. ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते हे बाबांचे परममित्र झाले . दोघांची जोडी ज्ञानार्जनात अग्रेसर होती. गुरु साखरे महाराजांचे ती अत्यंत आवडीचे साधक बनले. तेथे त्यांनी गीता , ज्ञानेश्वरी, विचारसागर ,वृत्तीप्रभाकर वेद - वेदांत आणि न्यायमीमांसा हा अभ्यास आळंदीत पूर्ण केला. परंतु,  ज्ञानाची भूक शमली नव्‍हती. प्रत्येक अभ्यासात विशेष प्राविण्य मिळवणे व त्याचा  जनकल्याणासाठी उपयोग कसा करता येईल ? हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. 

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या निवासस्थानी जेवढे घेता येईल , तेवढे घेतले. माऊलींच्या समाधीवर माथा ठेवून पुढील शिक्षणासाठी पंढरपूरला गेले. विठूमाऊलीच्या  दर्शनाने लीन होऊन ' ते' रूप डोळ्यांमध्ये साठवले , अंतकरणात ठेवले.  पुढील शिक्षण पंढरपूरच्या अनेक मठामधून तर , मदन महाराजांच्या कडे - भागवत, एकादशस्कंद , श्रीमद्भागवत, आद्वैतामोह , तुकाराम गाथा शिकले. त्याचबरोबर , विश्राम महाराजांकडे  तर्कसंग्रह,न्यायबोधिनी , निळकंठी, सिद्धांतबिंदू, ग्रंथ शिकले. प्रत्येक मठातुन कोणत्या ना कोणत्या ग्रंथाचे नामस्मरण, चिंतन-मनन ,श्रवणाने ते स्वतःमध्ये वेगळीच अनुभूती घेत होते. भगवान परमात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव मात्र त्यांना आला नाही. प्रत्येक ग्रंथ व त्यातील त्याच्या ज्ञानाचा उपयोग स्वयं आत्मबोधासाठी करत. परंतु,  त्यांचे फलित प्राप्त होत नाही ,ही 'सल', मनामध्ये सारखी नव चैतन्याचा चा बोध घेण्यासाठी खुणावत होती. बाबांचा आशावाद वाखाण्याजोगा होता. ज्ञानार्जनाची अंतिम भुख भागत नव्हती . त्यांना अपेक्षित असणारे ज्ञान मिळत नव्हते. म्हणून, त्यांनी पंढरपूर सोडण्याचा निर्धार केला. वेद - वेदान्ताचा, उपनिषदांचा अभ्यास अर्थात उच्चशिक्षणासाठी ऋषिकेश डोळ्यासमोर आले. शेवटी विठू माऊलींचे दर्शन घेऊन पुढील अध्यात्माचा कळस प्राप्त करण्यासाठी ऋषिकेश ला रवाना झाले. 

वेद वेदांताचा , उपनिषदांचा अभ्यास करण्यासाठी बाबा ऋषिकेश ला आले होते. अध्ययनाला सुरुवात झाली . अभ्यास प्रवृत्ती उत्तम असल्याने, त्यांना तेथील अभ्यास रुची वाढत गेली. सर्व विषयात विशेष प्राविण्य मिळवणे हा त्यांचा हातखंडा आगळा वेगळा होता. एवढेच न करता त्यांनी आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी, राष्ट्रीय भाषा हिंदी , अध्यात्मिक भाषा संस्कृत वर विशेष प्रभुत्व, त्यांनी मिळवले होते. आजही त्यांचा हा हातखंडा मच्छिंद्र गडावर अनुभवास येतो. प्रवास जरी खडतर होता तरी ,बाबानी श्रीगुरुंच्या आश्रमात अव्वल स्थान मिळवले होते. सिताराम बाबा आता सिताराम राहिले नव्हते. वेदशास्त्रात विषेश नैपुण्य मिळवले होते . श्री गुरु त्यांच्यावर प्रसन्न होते. 

 14 वर्षाच्या तपश्चर्येचा खडतर प्रवासाचा मार्ग संपला होता. हा मार्ग त्यांनी अगदी सहजपणे पार केला होता. ज्ञानार्जनाच्या भुकेचा परिणाम होता. ही आवड पाहून त्यांची विशेषता, परिपक्वता होती. आज पर्यंतचे सिताराम बाबा आता श्रीगुरुंच्या नजरेत एक 'आनंद' होते. 'निगम' म्हणजे 'वेद' . श्रीगुरुंनी सिताराम मध्ये वेदांचा झुळझुळणारा आनंदी झरा पाहिला. या आनंदी झर्‍याला त्यांनी "निगमानंद" या नावाने संबोधन केले.  14 वर्षाच्या अभ्यास तपश्चर्येने, तर सिताराम बाबा आता निगमानंद झाले होते. आज सर्व परिसर, भक्तगण, महाराष्ट्रभर त्यांना हरिभक्त परायण श्री स्वामी निगमानंद महाराज म्हणून ओळखतात. मच्छिंद्रनाथ गड निवासी निगमानंद माऊली लोकांच्या समस्या सोडवण्यात व समुपदेशनात अहोरात्र व्यस्त असतात. 

 आचार्य पदाचे शिक्षण घ्यावे, ज्ञानदान करावे, हा विचार मनात आला नाही. त्यांनी या शिक्षणाचा उपयोग समाज कल्याण साठी करावा, हाच विचार सूचक होता. पुढे भारत-भ्रमण ,तीर्थयात्रा, करताना अनेक खडतर प्रवासातील आठवणी, अंगावर शहारे आणल्याशिवाय राहत नाहीत. आपले आयुष्य मायंबा च्या सेवेसाठी आहे. 'अर्थ' हा आपल्यासाठी गौण आहे. रेल्वेतून विनातिकीट प्रवास हा भयाण असे. विनातिकीट प्रवास मध्ये टी.सी.ने त्यांना पकडल्यानंतर, दोन-तीन दिवस तिथेच काढत. भगवा वेश 
व  'साधू' खात्री पटल्यानंतर त्यांना सोडून देण्यात येई . अत्यंत वाईट प्रसंगांना तोंड द्यावे लागले, सोबतीला मात्र ग्रंथ होते! 

वृंदावन गोकुळ पाई प्रवासातला गाजरांचा प्रसंग, प्रत्यक्षात त्यांच्या तोंडून ऐकताना अक्षरशः डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. रखरखत्या उन्हात बाबा गोकुळ ला जात होते. पोटात आग पडली होती. आजूबाजूला एकही गाव नव्हते. चहूबाजूंनी फक्त शेतीच - शेती दिसत होती. चालून चालून शरीर थकले होते. एक पाऊल सुद्धा  पुढे ओढत नव्हते. बाजूला एका शेतात एक शेतकरी, आपल्या भार्या सोबत गाजरे काढताना  दिसले. बाबांनी त्यांना विचारले," गोकुळ किती दूर आहे ?" त्यांनी त्यांना सांगितले खूप दूर आहे. तेव्हा त्यांनी त्या माउलीला भिक्षा मागितली, त्या मातेने ओंजळ भरून गाजरे घेतली व बाबांना दिली. यमुनेच्या काठी येउन, स्नान करून,पूजाअर्चा करून गाजरे सेवन केली,आणि गोकूळा कडे मार्गस्थ झाले.                                    
                                                              क्रमशा: ... 


                         Writer: Rahul Dongardive
                         
                  
                                        

                



बुधवार, ३ मार्च, २०२१

निगमानंद माऊली : दि अनटोल्ड स्टोरी (भाग 2)

निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी भाग : 2         

      :: शीलवान माता-पिता ::

स्वामी निगमानंद महाराज

पुत्ररत्न प्राप्तीनंतर विठोबा पार्वती हे दांपत्य आनंदाने मायंबाची सेवा करू लागले. उदरनिर्वाह हाही व्यवस्थित चालला होता . कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नव्हती. दररोज कष्ट करून संतराम चं पालनपोषण सुरू होतं . संतराम जसजसा मोठा होत होता, तसे त्यांचे नामांतरण  होत होते . कोणी 'संतराम बुवा 'म्हणत असत, तर कोणी 'संतोबा' म्हणून बोलत असत. संतराम पेक्षा संतोबा हे नाव जास्त बोलले जाई . 

 संतोबा आता मोठा झाला.  प्रत्येक आई-वडिलांच्या मनात सामान्य  आई वडीला  प्रमाणे संतोबाच्या लग्नाचे विचार येत होते.  उतारवयातील पुत्रप्राप्तीचा आनंद हा . चातक पक्षाची , पावसाच्या पहिल्या सरीने तृष्णा भागते, तसंच झालं . विठोबा व पार्वती आता संतोबा च्या मुलांच्या  अर्थात नातवंडांचे गोड स्वप्न पाहत होते . लग्नाचा विचार मनात सुरू होता . शेवटी ज्या गोष्टीची अपेक्षा होती ती पूर्ण झाली . संतोबा साठी योग्य अशी वधू त्यांना मिळाली . नाव होतं , शेवंता . ठरल्याप्रमाणे संतोबा व शेवंताचा विवाह झाला. निर्विघ्न मंगल सोहळा पार पडला. वंशाला दिवा म्हणून विठोबा पार्वतीचा त्याग व कष्ट यांची जाणीव दोघांच्या मनात सारखीच होती . त्याच वंशाचा 'दिवा 'आज विवाह बंधनात गुंफतांना स्वतःला दे धन्य मानत होते . मायंबाची सेवा मात्र सुरू होती. 

मंगल सोहळा पार पडला . शेवंता तशी नवखीच, आई- वडिलांच्या लाडाच्या छायेत वाढलेली. सर्व जरी नवीन असलं , तरी सासू सासरे यांमध्ये स्वतःच्या आई-वडिलांना पाहत होती . ती सासरी आल्यानंतर सर्वांशी मिळून मिसळून वागत होती.  माहेरचे सद्गुण पावलोपावली दिसून येत होते. संसाराची अवीट गोडी मात्र जगावेगळी होती . एवढी सद्गुणी सून मिळाली म्हणून ते देवाचे आभार मानत होते . मनातल्या मनात सद्गदित होत होते. 

आई-वडिलांप्रमाणे संतोबा व शेवंता आपल्या संसाराला लागले . परंपरेनुसार संतोबा व शेवंतानं संसारा बरोबर मायंबा ची सेवा चालू ठेवली . सेवा अविरतपणे आणि संसार जिद्दीने करायचा , हे सुत्र मनाशी ठेवलं होतं . प्रत्येक स्त्रीसाठी एक जगातील सर्वात मोठा बहुमान असतो. तो म्हणजे 'मातृत्व' ! शेवंताबाई नाही आई ची स्वप्न पडू लागले  . कुलवंत भूषण माता जिजाऊंनी स्वराज्याच स्वप्न पाहिलं . कारण त्या स्वतः एक सरदाराची पत्नी होत्या . रयतेचा त्रास त्यांना सहन झाला नाही . म्हणून त्यांनी एक 'राजा' पाहिला . जनतेच्या कल्याणाचा विचार करणारा . आणि 'जनसेवा हीच ईश्वर सेवा', हाच ध्यास बाळगला - अर्थात कल्याणकारी राजा जन्मालाा.  नाव त्याचं ' शिवबा!'  पण....संसाराचा गाडा हाकताना, अनेक समस्यांना तोंड देता- देता नाकी नऊ यायचे . असा सामान्य संसार तोही गरिबीचा . पण..शेवंताबाई कधीही डगमगल्या नाहीत . सदैव संतोबाच्या खांद्याला खांदा लावून संसार केला. 

शेवंताबाई ज्याप्रमाणे 'आई' या शब्दासाठी आसुसल्या होत्या . त्या शब्दामागे काठिण्यपातळी व त्यागही होता . देवदैठण ची संपत्ती त्यांना थोडाही स्पर्श करत नव्हती. संतोबा नांदेवालीतच काम करत असायचे. स्वातंत्र्योत्तर काळात देवदैठणहुन  संपत्तीच्या नोटिसा येत. पण जेव्हा तेथील इतिहास त्यांच्या लक्षात येई,   तेव्हा मात्र त्यांनी देवदैठण च्या संपत्तीचा मोह सोडून दिला. येथे राहायचे आणि देवाची सेवा करायची .एवढेच मणी होत . देवदैठण व तेथील जमीन जुमला संपत्ती ही संकल्पनाच त्यांच्या मनातून निघाली , ती कायमची. कारण ,त्यांना आता मायंबा च्या सेवेत खंड पडू द्यायचा नव्हता. येथेच कामे करत असताना, त्यांना पुढे देशमुखाच्या, कूळ कायद्यांतर्गत जमिनी मिळाल्या होत्या. 

बिकट परिस्थितीतून ही शेवंताबाई संसार पुढे नेत होत्या . मातृत्वाची अतृप्त भावना मनाला सारखी फुंकर घालत होती . मायंबाची सेवा मात्र  अखंडित होती.  शेवटी मनातील घालमेल , अस्वस्थता , मातृत्व इच्छा,  कुलदीपक याविषयीची भावना , मागणं , मायंबाला बोलली, "देवा मला दोन मुले दे , एक माझ्यासाठी व दुसरा तुझ्या अखंड सेवेसाठी! " 
असा नवस किंवा मागणं असाधारण असंच होतं. एक वंशाला कुलदीपक व एक  मायंबाजी सेवा करण्यासाठी . बोलण आणि त्यानुसार वागणे ,काही समान्य गोष्ट नव्हती . शेवंताबाईनी निर्धार केला होता. का कुणास ठाऊक ? पण एक असामान्य शक्ती त्यांच्या पोटी जन्माला येणार होती की काय ? या प्रश्नाचे उत्तर त्या मातेलाच माहिती, की ज्यांनी हा  संकल्प केला होता. 

 शेवंताबाईचा नवस ,  हा त्यांना आधार होता . कालांतराने मायंबा चा प्रसाद त्यांना मिळाला . पहिले मूल जन्माला आले ,आणि तोही मुलगा! संंतोबा  शेवंताबाई  आनंदाने नाहून गेले. पहिल्या मुलाचे नाव त्यांनी 'नरहरी' असं ठेवलं. शेवंता बाईंना माहित होत  नरहरी फक्त माझा आहे . पुढेही मला मुलगाच होणार, तो मात्र , मायंबाचा! पुन्हा अशीच काही वर्ष निघून गेली . शेवंता बाईंना दुसरे पुत्ररत्न झाले. केलेली सेवा,  साधना, कष्ट फळाला आले होते . शेवंताबाई थोड्या ही थरथरल्या नाहीत. कारण दुसरे पुत्र् रत्न माझं नसून मायंबा चा सेवक आहे . मी त्याला दान करणार . हे वास्तव त्या विसरल्या नाहीत  . दुसऱ्या मुलाचं नाव त्यांनी सिताराम ठेवले. दुसऱ्या रत्नप्राप्तिनंतर त्यांना मुलगी झाली. तिचे नाव त्यांनी सावित्रा ठेवले . शेवंताबाई चेेेेेेेेे बहुमोल असे आई बनण्याचे स्वप्न  साकारले. देवगुंडेे घराण्याला कुलदीपक मिळाला होता .  आता घरात साक्षात गोकुळ अवतरले होते. 

फुललेला संसार पाहून संतोबा आणि शेवंताबाई नेटाने काम करत होते. मनोभावे देवाची सेवा तर सुरूच होती. नरहरी थोरला होता . नरहरीला देवाचा नाद ,अध्यात्माची गोडी अत्यंत होती. सिताराम उंचपुरा, रुबाबदार व्यक्तिमत्व ,मत मांडण्याची एक वेगळीच हातोटी होती. प्रत्येक बाबतीत सीताराम! नरहरीला ला मात्र नमते घ्यावे लागत असे. दोन्ही बंधूंच्या छत्रछायेखाली धाकटी बहीण सावित्रा अक्का वाढत होती. 

सिताराम ला सर्व मायंबा किंवा बुवा म्हणून आवाज देत असत. बाळ सीतारामांना  याचा अर्थ सुरुवातीला समजत नसे. पण जसजसा बालक सिताराम मोठा होऊ लागला, तसे त्या पाठीमागचे  गमक त्यांच्या लक्षात येऊ लागले. त्यांच्या लक्षात या गोष्टी आल्यानंतर त्यांच्यामुळे स्वभावात बदल जाणवू लागला. त्यांचा करारीपणा , निर्णय क्षमता , बालवयातच भक्कम होती . नरहरी बंधूंना अध्यात्माची गोडी त्यांच्या पेक्षा जास्त होती. पोथ्या पुराणे त्यांच्या अवताच्या दांडीला बांधलेले असायचे . प्रत्येक वेळेला त्यांना संसार  सुखातुन मुक्त होऊन भक्तिमार्ग अवलंबावा असेही वाटे. पण. .. सीताराम त्यांना त्यांच्या आईच्या शब्दाची आठवण करून देत असत, - "तुम्हि संसारासाठी, मी  मायंबा साठी! "  म्हणून सितारामांना गावात मायंबा म्हणूनही बोलत असत. 

शेवंताबाई नि ठरल्याप्रमाणे पहिलं मूल स्वतःला , आणि दुसरे मूल मायंबाला!  हा संकल्प मोठ्या मनाने पूर्ण केला.  सिताराम मायंबा वर सेवेसाठी दिला , नरहरी स्वतःला, त्यांनी स्वतःचा कुलदीपक म्हणून ठेवला. मायंबा च्या सेवेसाठी दिलेला सिताराम हा सामान्य बालक नसून आजचे ते श्री हरिभक्त परायण स्वामी निगमानंद महाराज आहेत. 

  Writer :  
- डोंगरदिवे  राहुल
       श्री निगमानंद विद्यालय निमगाव ,             ता.शिरूर

मंगळवार, २ मार्च, २०२१

निगमानंद माऊली: द अनटोल्ड स्टोरी ( भाग 1)

 निगमानंद माऊली : द अनटोल्ड स्टोरी 

  भाग :१

स्वामी निगमानंद महाराज

महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून अखंड भारतात परिचित आहे. या भूमीत अनेक संत महात्म्याची जडण-घडण झाली .थोर महात्म्यांच्या कार्याची आत्म उन्नती सिद्धीची सत्वपरीक्षा. यातून जे तावून सुलाखून निघाले , किंबहुना चित्ताची शुद्ध बीजे भरली , तीच शुद्ध बिजे  , या भूमीचे पवित्र राखण्यात, यशाची यशोशिखरे काबीज करण्यात , अध्यात्माची कारणमीमांसा व यथोचित परिपाक , फलनिष्पत्ती पर्यंत पोहोचली . आत्मशुद्धीसाठी निरागस चिंतन , मनन आणि सत्याची पारख यांचा संयोग व मनोमिलन यासाठी ही भूमी सदोदित अग्रेसर राहिली . महाराष्ट्राच्या सर्व विभागातून अतुलनीय व्यक्तिमत्व उदयास आली . 'उद्याला' घडवण्यात सु संस्कारक्षम बनवण्यात व मानवहीत जोपासण्यात आपला उभा जन्म झिजवला. मानव एक साधन नसून जीवनाचे अंतिम फलप्राप्ती अर्थात मोक्षप्राप्तीचे साध्य बनवले. माणसाच्या मनातील अनेक पैलूंचे विविध रंग समोर आणले. विज्ञानवादी सिद्धांतानुसार -' अनाकलनीय गोष्टींगोष्टींचा शोध म्हणजे विज्ञान, आणि त्या शोधाचा मानव जातीच्या कल्याणासाठी किंवा भौतिक सुखासाठी चा उपयोग म्हणजे तंत्रज्ञानतंत्रज्ञान'. अगदी त्याच पद्धतीने या थोर महात्म्यांनी मानवी दुःखाचा शोध अध्यात्मिक शक्ती व ध्यानधारणेतुन घेतला. दुःखाचे मूळ कारण शोधून ते दुःख होऊ नये म्हणून उपाय सुचवले. वास्तविक पाहता सात्विक आचरण व शील अबाधित ठेवणे ,  ही स्वयंशिस्त बंधनकारक ठेवली. 

अशाच एका  थोर विभूती ची महती व त्यांच्या या आध्यात्मिक ज्ञानाचा उपयोग समाज कल्याणासाठी होतो आहे वास्तव मानवरूपी देहामध्ये साक्षात ईश्वराचा अंश आहे हे अनुभवातून प्रत्येकालाच अनुभूती येते आहे याचे साक्षीदार आपणास परिसरात भेटतीलही एका शुद्ध चित्ताच्या महात्म्याची मानव कल्याणाचा वसा घेतलेल्या वंदनीय हनुमंताची  गाथा मच्छिंद्रगड निवासी

 गुरुवर्य श्री ह.भ.प. स्वामी निगमानंद माऊली! 

एक गाव देवदैठण ,जिल्हा अहमदनगर . गाव तसं छोटं . पण  सार्वभौम , परिपूर्ण असलेल. माणसेही प्रेमळ सुस्वभावी एकमेकांच्या अडीअडचणींना धावून जाणारे. देश पारतंत्र्यात होता,.परंतु , स्वयंपूर्ण खेडे होते . तत्कालीन परिस्थितीत आवश्यक गरजा गावांमध्ये हे पूर्ण होत असत. सर्व लोक गुण्यागोविंदाने राहत होती . याच गावात एक सद्गृहस्थ राहत होते .ते म्हणजे, श्री विठोबा देवगुंडे . गावात त्यांना खास माण असे. त्यांचा लोक आदर करत असत . गावामध्ये एक मोठा वाडा होता, बैल , बारदाना , शेतात मोठी आंबराई होती. विठोबाचे कुटुंब एक सुसंस्कृत व गुणीजन सदस्य सोबतीला , चतुर्भुज असणारे चार बंधू. 


श्री विठोबा देवगुंडे म्हणजे निगमानंद माऊलींचे आजोबा . आर्थिक सुबत्ता होती. परंतु , नियतीने वेगळेच या  कुटुंबाविषयी डाव आखले होते. भयावह दुष्काळ पडला. दुष्काळामुळे पुर्ण गावावर  स्थलांतराचे  सावट कोसळले . भयावह प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रत्येक गावकरी स्थलांतर करू लागला. हाच प्रसंग देवगुंडे परिवारावर सुद्धा आला . विठोबा देवगुंडे यांचे चार  बंधूचा, विठोबा यांच्या जीवनात कायमचा दुष्काळ पडला . दुष्काळामुळे विद्यार्थ्यांचे चार बंधू स्थलांतरित झाले ते परत आलेच नाही. 

बंधू विरहाने विठोबा खचून गेले. त्यांना काय करावं? ते सुचत नव्हतं . या न सोसणाऱ्या या दुःखात सोबतीला सद्गुणी असणारी सौभाग्यवती पार्वतीबाई होत्या. या भयावह प्रसंगाला कसं सामोरं जायचं?  हा यक्षप्रश्न त्यांना सारखा सतावत होता . तरीही पार्वतीबाई त्यांना धीर देत होत्या . पण विठोबाच  मन एवढ्या मोठ्या वाड्यात लागत नव्हतं . त्यामध्ये स्वतःला मूलबाळ होत नाही . एवढ्या मोठ्या समस्या होत्या. मग एवढ्या मोठ्या संपत्तीचा उपयोग काय?  काय करावं? कुठे जावं? आता कोणासाठी जगाव ? अशी  नाना तर्‍हेची  प्रश्न त्यांना जाब विचारत होती . उत्तर शोधूनही मिळत नव्हत. 

अण. .या दांपत्याला त्यावर उपाय सुचला . विठोबा नी सौ पार्वतीबाईंना बोलून दाखवलं , गाव सोडायच. पार्वतीबाईंनी तो उपायाला , कसलेही आढेवेढे न घेता होकार दिला. या दांपत्याला एवढ्या मोठ्या संपत्तीचा मोह वाटला नाही .पती परमेश्वर यानुसार पतीची आज्ञा  पाळली. नवीन गावाचा शोध घेत हे दांपत्य शेवटी शिरूर तालुक्यातील नांदेवली या गावी  पोहोचले. 

नांदेवाली गावात त्यांना मिळेल ते काम करू लागले. उदर निर्वाह सुरू झाला. गावात सर्वांशी चांगले राहू लागले . मनमिळावू स्वभाव , सरळ साधी राहणी, मोहमाया या गोष्टी कोसोदूर. सर्वांचे हितचिंतक व प्रांजल वाणी मुळे हे दांपत्य लोकप्रिय झाले . एवढ्यात जवळच  असणाऱ्या मायंबाची महत्ती या दांपत्याला कळली. श्री विठोबा व सौ पार्वती यांच्यामध्ये मायंबा ला शरण जाण्याची तयारी झाली. सात्विक विचाराचे विठोबा मायमबा च्या दर्शनाला जाऊ लागले. 

भारतावर मोगलांचे आक्रमण त्यांची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केलेली अन्याय-अत्याचार व हिंदू मंदिरावर ची आक्रमणे याची जाणीव सर्वांनाच आहे . भारतातील सर्वात मोठा संप्रदाय म्हणून नाथ संप्रदाय ओळखला जातो. नाथ संप्रदायाची महती ही लोककल्याणाची होती . त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपली कार्य पार पाडली, ते ठिकाण त्यांची वसतिस्थाने मंदिराच्या स्वरूपात उभारली. मंदिराच्या स्वरूपात उभारली . अशा मंदिरावर मुघलांनी आक्रमण करून त्या ठिकाणी मुस्लिम दर्गाह निर्माण केले होते. 

मुघलांच्या आक्रमणाला बळी पडलेली मच्छिंद्रनाथ निवास करत होते . ते ठिकाण म्हणजे , तत्कालीन  'मायंबा' होय. मायंबा चे पुजारी बाबाजी महाराज देवकर , तद्नंतर लुंडमुंड बाबा , बागुजी बाबा, आणि वैकुंठवासी धोंडीराम महाराज हे होते . जेव्हा विठोबा पार्वती वंशाला दिवा हवा म्हणून  , लुंडमुंड बाबा पुजारी असताना मायंबा ची सेवा करू लागले . लुंडमुंड  बाबांची सेवा मनोभावे केली. देवगुंडे दांपत्याला आशा होती . वंशाला दिवा हवा .बंधू विरह आणि वंश याच कारणासाठी त्यांनी देवदैठण सोडले होते . सलग बारा वर्षे सेवा मायंबा ची केली. वयही वाढत होत . बारा वर्षानंतर  लुंडमुंड बाबांनी विठोबाना व पार्वतीबाईंना आशीर्वाद दिला,  "तुमचे वय राहिले नाही मुलगा होण्याचे, परंतु, तुम्हाला मुलगा होईल. "

अखेरीस लुंडमुंड बाबांचा आशीर्वाद खरा ठरला. विठोबा पार्वतीबाईंना पुत्ररत्न प्राप्त झाले दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला आतापर्यंत झालेल्या असंख्य दुःखातून त्यांना अनेक वर्षानंतर सुखद अनुभव होता मायंबा च्या कृपेने पुत्ररत्न प्राप्त झाल्याने त्याचे नाव संतराम ठेवले. पुढे लोक त्यांना आदराने संतोबा असं म्हणत.

                                                         - राहुल डोंगरदिवे

                                                  श्रीमंत निगमानंद विद्यालय                                                               निमगाव,ता. शिरूर                                                           

                                                             क्रमशा:..... 

सोमवार, १ मार्च, २०२१

मी

                             " मी "


प्राचीन कालखंडापासून ते आजतागायत पर्यंत जगाच्या पाठीवर ,  अनेक थोर वीरपुरुष , राजे-महाराजे, सम्राट होऊन गेले . प्रत्येकाने आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले . कोणी आपल्या सार्वभौमत्वाला तडा जाऊ नये म्हणून कसोशीने प्रयत्न केले . प्रयत्न करत असताना , युद्ध - महायुद्ध ही झाले . युद्धांमध्ये याच् पृथ्वीवरील  हजारो सैनिकांच्या जीवांचा नायनाट सुद्धा झाला . तत्कालीन राजेशाही, राजघराने नष्ट झाली . नवीन राजे- महाराजेे,  सम्राट , उदयास आले. अशी इतिहासाची पुनरावृत्ती सदैव होत गेली . साम्राज्यवाद , भांडवलशाही ,श्रमिक अशी व्यवस्था निर्माण  झाली . यातूनच पुढे ,'आहे रे ' व 'नाही रे ' अशीही ' वर्ग् ' निर्माण झाले . या सत्ता संघर्षातून जगभर साम्राज्यवादाची वारे वाहू लागले . पाश्चिमात्य देश आपला भूखंड वाढवण्यासाठी जगभर सैरावैरा भ्रमंती करू लागले . भ्रमंतीतून अनेक नवीन भूखंडांचा आणि देशाचा शोधही लागला. या शोधातून साम्राज्यवादाची मुहूर्तमेढ रोवली गेली.हे सर्वश्रुत आहे.

अशा या सत्ता संघर्ष आणि स्पर्धेच्या काळात गुलामीची प्रथाही आली. युरोपीय देश सर्व जगावर सत्ता प्रस्थापित करण्याचा अधिकार - हा आमचा आहे , असा दावा करू लागले .  युरोपमधील  काही राज्य , देश -आमचा वंश , धर्म , विचारसरणी , श्रेष्ठ कशी आहे ?  हे दाखवण्यासाठी आगेकूच करू लागले . येथे संघर्ष पेटला . युरोपियन  राष्ट्र आपापल्या    वसाहती स्थापन करण्यासाठी राष्ट्र राष्ट्रात भांडू लागले . युरोपीय भूमी कमी पडू लागली. म्हणून, ज्या  ठिकाणी दिसेल , त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वाचा  वापर करून , आपल्या वसाहती स्थापन करू लागले . यातूनच स्वामित्वाची भूमिका उदयास आली . या स्वामित्वा तून श्रेष्ठ कोण ? हा प्रश्न उदयास आला आणि त्याचे उत्तरही त्यांनाच मिळाले तो म्हणजे 'मी! '
अशा प्रकारची व्यवस्था जगभर असताना , पूर्वेकडील  राष्ट्र सुद्धा काही कमी नव्हते . या ठिकाणी सुद्धा सत्तासंघर्ष चालू होता .परंतु , हा सत्ता संघर्ष हा ज्या- त्या देशापुरता मर्यादित होता. पश्चिमेकडील राष्ट्र हे आपल्या साम्राज्य बरोबर धर्माचाही विस्तार करत होते . पौर्वात्य राष्ट्र मात्र धर्मापेक्षा धर्मातील असणाऱ्या जातीनुसार व्यवहार करत होते . खास करून भारताचा जर विचार केला,  तर धर्म श्रेष्ठ होता. 'काळे' आणि 'गोरे' या वर्णव्यवस्था पेक्षा येथील वर्ग व्यवस्था खूप भयंकर होती . ती अवर्णनीय आहे .असे म्हटल्यास, वावगे ठरू नये . त्यातच 'मी' हा खच्चून भरलेला होता . पाशिमात्य राष्ट्रांनी पौर्वात्य राष्ट्रांचा मानबिंदू ओळखला . "फोडा आणि राज्य  करा  ''  या तत्त्वाचा अवलंब करत पूर्ण अखंड भारतावर साम्राज्य प्रस्थापित केले . सर्वोच्च् वसाहती स्थापन करण्यात इंग्लंड अग्रेसर ठरला . दीडशे वर्षे अधिकृत राज्य केले किंबहुना अडीचशे वर्षे राज्य केले यालाही कारणीभूत ठरला , तो म्हणजे ' मी '. 
 
एवढा ऐतिहासिक प्रपंच मांडण्या पाठीमागच  कारण एवढंच माणसाच्या नसानसामध्ये 'मी' हा ठासून भरलेला आहे. त्या 'मी' साठी आजही अनेक प्रपंच राजघराणे नेस्तनाबूत होताना पाहत आहोत . यां 'मी' ला जर आपण थोडसं बाजूला ठेवलं  तर कोणाचीही हानी होणार नाही. 
अहम - ईर्षा माणसाकडे असतात, परंतु स्‍वकर्तृत्‍वातून मिळालेले 'यश ', आगळा वेगळा आनंद देणार असत. त्यातील असणारा स्वाभिमान -अभिमान हा गौरवास्पद असतो . पण एकमेकांची जिरवण्यासाठी  निर्माण झालेला ' मी ' कधी ? कशी ?   केव्हा ? कोणाची ? किंवा स्वतः च  स्वतःची वाट लावतो, हे कळतही नाही ! तरीही गुर्मी  उतरत नाही ! याला एकच कारण आहे , ते म्हणजे 'मी'! 

या भयंकर 'मी' ला बाजूला ठेवून स्वतःतील 'आम्ही ', 'आपण'  या पद्धतीने आत्मसन्मान , स्वाभिमान जागृत केल्यास, मिळणाऱ्या परमोच्च आनंदाचा , रसास्वाद हा निश्चितच अलौकिक असेल यात शंका नाही . 
            
             WRITER # DONGARDIVE RAHUL




रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

मन

                  मन



मनाच्या संवेदना जेवढ्या स्थिर आणि चंचल आहेत, तेवढ्या गंभीरही आहेत. 'व्यक्ती तितक्या प्रकृति!'  संवेदनाची चंचलता एक सारखी नाही. प्रत्येक  वाद -विवाद , संवाद , वार्तालाप आणी तात्कालिक घटना होण्यामागे चक्रव्यूह आसते. भेदक मारा  करून अचूकपणे बाहेर येणे, 'सत्य' सिद्धता करणे , परंतु त्या  प्रसंगाला तोंड देण्यासाठी  माणसाकडे इच्छाशक्ती हवी असते.  इच्छाशक्ती  फक्त आपले मनच देऊ शकते  त्यासाठी हवे असते एक् सदृढ मन! 

निसर्ग नियमानुसार याप्रमाणे शरीर थकते . त्याला जखमाही होतात. शरीरावरील जखमा या आठ-दहा दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर भरूनही निघतात. अगदी त्याचप्रमाणे मानवी मनाला ही जखमा होतात, मन घायाळ होते . मनाला झालेली जखम कधी कधी सहज भरून येते. परंतु ,खोल झालेल्या जखमा मात्र आयुष्य भर भरून येत नाहीत. एखाद्या गोष्टीवर मात करण्याची क्षमता मनामध्ये आहे . त्याची क्षमता ,'स्वतःला नष्ट करण्यामध्ये सुद्धा आहे'. त्या मनाला योग्य  हाताळल्यास त्याला योग्य दिशा देता येईल. 

या सर्वांग सुंदर मनामध्ये सकारात्मक दृष्टिकोनाचे बीज पेरणी केल्यास ,त्यातून नवनिर्माण अंकुर उदयाला येतील . ते अंकुर निश्चितच  कणखर, दणकट आणि संयमी असतील .मग प्रश्न पडतो, या मनाला तंदुरुस्त कसं बनवायचं ? बरोबर ना! या मनाला तंदुरुस्त बनवण्यासाठी, जसे या मानवी देहाला व्यायामाची आवश्यकता आहे . तशीच या मनाला सुधा सुद्धा व्यायामाची आवश्यकता आहे. मन  जर नियंत्रणात असेल तर जगातील 'अशक्य' ते 'शक्य' करण्याची ताकद शेवटी या मनातूनच निर्माण होते. हे विसरता कामा नये. या मनाला नियंत्रणात ठेवायचे असेल, तर त्यासाठी विपश्यना,'विपश्यना' हे एक प्रभावी तंत्र आहे . या तंत्राचा दैनंदिन वापर जर केला, तर तुमचे मन निश्चितच तुमच्या नियंत्रणात असेल. यात कसलीच शंका नाही. संत रविदास सुद्धा सांगतात, "मन चंंगा तो , कटौती मे गंगा." याउपरही संत तुकाराम सुद्धा सांगतात ,"मन नाही रे निर्मळ काय करील साबण "प्रत्येक धर्माचे अध्यात्म सुद्धा तेच सांगते ,"चित्त की शुद्धता" यही मन है ! 

            

   WRITER:

 # DONGARDIVE RAHUL